हॅलो कृषी ऑनलाईन : नगर जिल्ह्याला टोमॅटोचं हब असं म्हटलं जातं. मात्र अकोला, संगमनेर भागातील बाजार समित्या काही दिवस बंद असल्यामुळे किलोमागे चार ते पाच रुपयांनी दर पडले आहेत. याचा फटका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे पंधरा दिवसात सुमारे 25 कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच ककुंबर मोजॅक व्हायरस व टोमॅटो क्लोरोसेस या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रादुर्भाव कमी असला तरी नुकसान मात्र होत आहे. त्यामुळे एकूणच शेतकरी हवालदिल झाला आहे.
नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर सह राहता तालुक्यात साधारण सात हजार हेक्टर क्षेत्रावर टोमॅटोचे पीक घेतले जाते. एप्रिल अखेरपर्यंत साधारण तीस चाळीस टक्के तोडा संपलेला असतो. मंगळवारी बाजार समित्या सुरू झाल्या असल्या तरी गेल्या पंधरा दिवसांपासून असलेल्या लिलाव बंदचा मोठा फटका बसला असून पाच रुपयांनी दर पडले आहेत. केवळ दर पडल्यामुळे टोमॅटो उत्पादकांना सुमारे 25 कोटींचे आर्थिक नुकसान झाले आहे. साधारण पाच हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर नुकसान झाले असून त्या नुकसानही 25 कोटींपेक्षा अधिक आहे.
गेल्या वर्षीपासून टोमॅटोवर राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन संस्थेने केलेल्या तपासणी नुसार कुकुंबर मोझॅक व्हायरस जीबीएनव्ही व टोमॅटो क्लोरोसिस या रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गव्हावरील मावाचा टोमॅटो वर परिणाम होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर यंदा कृषी विभागाने कार्यशाळा घेऊन शेतकऱ्यांना माहिती देत दर वर्षीच्या तुलनेत यंदा एक महिना उशिरा लागवड केली. त्याचा परिणाम म्हणून रोगाचा प्रादुर्भाव कमी करता आला यंदा साधारण 20 टक्क्यांवर हे प्रमाण असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आला आहे.