हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवनी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत सातारा इथे भात लागण शुभारंभ राज्याचे अर्थ व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.
याबाबत मिळालेली अशी की , महाराष्ट्र शासनाच्या कृषी संजीवनी मोहीमे अंतर्गत यांत्रिक पध्दतीने भात लागण शुभारंभ तांबवे येथिल शेतकरी जंगम यांच्या शेतात राज्याचे अर्थ व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम जि.प. सदस्य प्रदीप पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाला. यावेळी कृषी सहाय्यक आबासाहेब कुंभार यांनी बीजप्रक्रीया, पर्यवेक्षक अशोक कोळेकर यांनी ॲमिनो ॲसिड तयार करणे व सुपरकेन नर्सरीचे मेहमूद शेख यांनी यांत्रीकीकरण भात लागवड, विनोद पुजारी यांनी रोजगार हमी योजना व फळबाग लागवड याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रांताधिकारी मे.उत्तम दिघे, जिल्हा कृषी अधिकारी मा.गुरुदत्त काळे,उपविभागीय कृषी अधिकारी मा.दौलत चव्हाण, तहसीलदार अमरदिप वाकडे, ग्रामस्थ उपस्थित होते.