हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी खरीप पिकांना अतिवृष्टीमुळे तर रब्बी ला अवकाळी पाऊस आणि थंडी यांचा मोठा फटका बसला आहे. खरीप पीक हातातून गेली रब्बीतही नुकसान झाले आहे. सोबतच अकोला जिल्ह्यामध्ये केळी, संत्रा फळबागांना ही तडाखा बसलाय. वातावरण बदल्यामुळे संत्रा बागांमध्ये फळांची गळती अवेळी पिवळे होण्याची समस्या समोर आली आहे. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतातुर झाले आहेत.
पाऊस ढगाळ वातावरण आणि किडींमुळे खरीप पीक रब्बीतील पिकांचे देखील नुकसान झालेले आहे आता गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण तयार होत असून रब्बीतील प्रमुख लागवड असलेल्या हरभरा पिकावर कीड रोग वाढले आहेत. हरभऱ्याचे झाड जागेवरच सुकत आहे. अकोट तेल्हारा तालुक्यात मोठ्या क्षेत्रावर असलेल्या केळी संत्रा बागांना ही या परिस्थितीचा फटका बसलेला आहे. यावर्षी हवामान बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांचा आंबिया बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच मृग बहाराची फळे लहान असताना पिवळी होऊन गळायला लागली आहे. केळीवर देखील करपा येऊन पाने पिवळी पडत आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे फळबागांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून आहे.