हॅलो कृषी ऑनलाईन : मागील ७ महिन्यांनपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्यात नवा कृषी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मत व्यक्त केले आहे. केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे असे त्यांनी म्हंटले आहे.
पुढे बोलताना मलिक म्हणाले की, राज्यात कृषी कायदा होताना शेतकरी विरोधात कुठलाही कायदा होणार नाही ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. याबाबत शरद पवार यांनीही कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट कृषी कायद्यासंदर्भात भूमिका मांडली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध नेत्यांवर होत असलेल्या कारवाई संदर्भात विचारलं असता आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी व पक्षाला बदनाम करण्यासाठी बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व परिवाराच्याबाबतीत ज्यापध्दतीने बातम्या पेरण्यात येत आहेत ते चुकीचे आहे, असेही नवाब म्हणाले.साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे. ज्या काही कायदेशीर कारवाई आहेत ते ईडी करत असेल. परंतु अजित पवार व त्यांच्या परिवारातील कुणीही बेकायदेशीर कामे केलेली नाहीत, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.