हॅलो कृषी ऑनलाईन : पुणे
नैसर्गिक आपत्ती आणि हवामानातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे पिकांचे होणारे नुकसान, त्यांना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना राबवण्यात येते. त्यानुसार या वर्षीच्या म्हणजेच 2021 पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केलं आहे.
योजनेबाबत महत्वाचे मुद्दे
— ही योजना आधी सूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे.
— कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे.
— उत्पादनक्षम फळबागांना पिक विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे.
— या योजनेमध्ये नुकसान भरपाई विमा महावेध प्रकल्पाअंतर्गत महसूल मंडळ स्तरावरील स्वयंचलित हवामान केंद्राच्या आकडेवारीनुसार ठरवण्यात येणार आहे.
— यामध्ये मानवी हस्तक्षेप राहणार नाही.
30 डिसेंबर अंतिम मुदत
दौंड, आंबेगाव, भोर, जुन्नर, मावळ, खेड, हवेली, शिरूर, वेल्हा ,मुळशी, बारामती, इंदापूर, सासवड या तालुक्यात आंबा पिकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021 असून विमा संरक्षित रक्कम हेक्टरी एक लाख 40 हजार रुपये एवढी आहे. तरी या करिता शेतकऱ्यांनी 15 हजार चारशे रुपये एवढा विमा हप्ता भरावयाचा आहे.
डाळिंब पिका करिता अंतिम मुदत…
दौंड, आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर, सासवड, शिरूर, हवेली, खेड या तालुक्यात डाळींब पिकासाठी 14 जानेवारी 2022 ही अंतिम मुदत असून विमा संरक्षित रक्कम रुपये हेक्टरी एक लाख तीस हजार रुपये आहे. शेतकऱ्यांनी 9 हजार 750 रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे.
विमा संरक्षण कालावधी
आंबा पिकासाठी विमा संरक्षण कालावधी 31 मे 2022 पर्यंत असून शेतकरी हिस्सा यासह केंद्र-राज्य असा एकूण विमा हप्ता 65 हजार आठशे रुपये आहे तर डाळींब पिकासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जानेवारी ते 31 जुलै 2022 असा असून एकूण विमा हप्ता 52 हजार रुपये एवढा आहे.
अधिक माहितीसाठी इथे करा संपर्क
— ई -मेल [email protected]
–18004195004 किंवा 02261710912 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करा.