हॅलो कृषी ऑनलाईन : हंगामाच्या सुरुवातीला दमदार पाऊस आणि त्यानंतर पडलेल्या पावसाचा खंड तसेच ढगाळ हवामान यामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मात्र त्रस्त झाले आहेत. पश्चिम विदर्भाचा विचार करता सोयाबीन पिकावर मागील एक आठवड्यापासून पडलेल्या पावसाच्या खंडा मुळे चक्रीभुंगा, खोडमाशी, उंट अळी यासारखा किडींचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वाशिम संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर भारत गीते यांनी या बाबत सविस्तर माहिती दिली आहे.
विविध किडीमुळे सोयाबीन पिकावरील होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच कीड व्यवस्थापनाचा व सोयाबीन पिकाला आताच्या अवस्थेत आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या वाशिम संशोधन केंद्राचे संशोधक डॉक्टर भारत गीते यांनी केला आहे.
करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन
मागील आठवड्यापासून पाऊस न पडल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच किडीचे व्यवस्थापन करावं असं गीते यांनी म्हटलं आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणी झालेलं सोयाबीनचे पीक आज फळधारणेच्या अवस्थेत असून या कालावधीत पिकांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम या अवस्थेवर पिकांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व कारणांमुळे होणारे नुकसान टाळण्याकरिता शेतकऱ्यांनी केळी सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे आवाहन डॉक्टर गीते यांनी केले आहे.
पावसाची ओढ चिंता वाढवणारी
ऐन फुल आणि शेंगा लागण्याच्या स्थितीत असताना गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पीक करपत आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत चांगला पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट येणार आहे. वाशीम जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात एकूण चार लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीन पीक घेतले जाते. त्यामुळे पावसाने दगा दिला तर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात येणार आहेत.