हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यभरात सरासरी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आता खरीप हा अंतिम टप्प्यात असून रब्बीच्या पेरणीकडे शेतकरी बांधवांचा कल आहे. तत्पूर्वी खरिपाची साठवणूक आणि रब्बीची पेरणी याविषयी मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषीतज्ञ डाकोरे यांनी एका माध्यमाद्वारे महत्वाचा सल्ला दिला आहे जाणून घेऊया…
1) ऊस :
ऊस पिकाच्या पुर्वहंगामाच्या लागवडीचा हंगाम आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीत वापसा झाल्यानंतरच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता निरा, निरा 262, फुले सावित्री यासारख्या वाणांची निवड करणे फायद्याचे राहणार आहे.
2) हरभरा :
हरभरा हे रब्बीतील महत्वाचे पीक आहे. यंदा पोषक वातावरणामुळे हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शिवाय कृषी विभागाकडूनही याकरिता प्रोत्साहीत केले जात आहे. त्यामुळे हरभऱ्याची पेरणी शेतकरी 10 नोव्हेंबरपर्यंतही करता येते. पेरणीसाठी विजय, विशाल, फुले ही जी कृषी विभागाने शिफारस केलेल्या वाणाचा उपयोग गरजेचा आहे. पेरणी करताना दोन ओळीत अंतर हे 30 सेंटीमीटर व दोन रोपातील अंतर हे 10 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. पेरणीपूर्वी बीजप्रक्रीया केल्यावर रोगकिडीचा प्रादुर्भाव हा कमी होतो. पेरणीनंतर 30 दिवसांनी पहिले पाणी देणे आवश्यक आहे.
3) रब्बी ज्वारी :
रब्बी ज्वारीची पेरणी झाली की कमीत-कमी हे पीक 35 ते 40 दिवस तणविरहीत ठेवावे लागणार आहे. कारण एकदा का जर पिकात तण वाढले तर ते अन्नद्रव्य ही शोषून घेते वाढीमध्ये ते पीकाबरोबर स्पर्धा करते. त्यामुळे तणाचे नियंत्रण योग्य वेळी केले तरच उत्पादन वाढणार आहे.
4) गहू :
गहू पेरणीला अद्याप अवकाश आहे. पण जमिनीत वापसा झाला की, भूमशागत महत्वाची आहे. गव्हाची पेरणी ही 1 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत करावी लागणार आहे. याकरीता जमिनीची मशागत करुन शेतजमिन ही तयार करुन ठेवावी लागणार आहे.
5) करडी पीक :
करडी पिकाच्या उगवणीनंतर 10 ते 12 दिवसांनी त्याची विरळणी करणे आवश्यक आहे. कारण पीक जर दाट झाले तर अन्नद्रव्यासाठी स्पर्धा होते आणि करडीची वाढ खुंटते. शिवाय विरळणी करीत असताना रोगट व खराब झाडे ही उपटून टाकावी ज्यामुळे इतर पीकाला त्याची बाधा होणार नाही. दोन रोपातील अंतर हे 20 सेंटीमीटर ठेवावे.
सोयाबीन, कापसाची योग्य साठवणूक
खरीपातील सोयाबीन आणि कापसाच्या वेचणीची कामे झाली आहेत किंवा अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे सोयाबीनमधील आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याला ऊनामध्ये वाळवणे आवश्यक आहे. तर कापसाची वेचणी ही सकाळी लवकर करावी कारण सकाळी हवेत आर्द्रता ही जास्त असते त्यामुले कापसाला काडी कचरा लागत नाही. शेतकऱ्यांनी अशा पध्दतीने रब्बी हंगामातील पीकांची पेरणी खरीपातील पिकांची काळजा घेतली तर नक्कीच फायदा होणार आहे.