हॅलो कृषी ऑनलाईन : केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामातील गहू खरेदी सुरु करण्याचं काम सुरु आहे. याअंतर्गत 30 मे 2021 पर्यंत किमान आधारभूत किमतीला 406.76 लाख मेट्रिक टन गहू शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आला आहे. तर, 43 लाख 55 हजार शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी करण्यात आली आहे, तर शेतकऱ्यांना 80 हजार 334.56 कोटी रुपये देण्यात आले आहेत.याबाबतची माहिती कृषिमंत्री तोमर यांनी देखील ट्विट द्वारे दिली आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांकडून 30 मेपर्यंत 787.87 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये खरिप हंगामातील 706.62 लाख मेट्रीक टन तर रब्बी हंगामातील 81.25 लाख मेट्रीक टन धानाची खरेदी करण्यात आलीय. किमान आधारभूत किमतीला 117.04 लाख शेतकऱ्यांकडून 1 लाख 48 हजार 750 कोटी रुपयांच्या धानाची खरेदी करण्यात आली आहे. सन 2020-21 च्या खरिप हंगामात उत्पादित झालेल्या डाळींची देखील विक्रमी खरेदी सरकारी खरेदी केंद्राद्वारे करण्यात आलीय. मूग, उडीद, तूर, चना, मसूर, भुईमूग,सोयाबीन इत्यादी डाळींची 7 लाख 14 हजार 695 मेट्रीक टन खरेदी करण्यात आली आहे. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, हरियाणा आणि राजस्थान मधील 4 लाख 25 हजार 586 शेतकऱ्यांकडून 3 हजार 741.39 कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली आहे.पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि जम्मू काश्मीरमध्ये किमान आधारभूत किमतीला गव्हाची खरेदी केली जातेय.