हॅलो कृषी ऑनलाईन : जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरवात केली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. त्यामुळे कृषी मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्वाचे आवाहन केले आहे.
राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये .@CMOMaharashtra @AUThackeray pic.twitter.com/0FUc6O6mgY
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) June 24, 2021
कृषी मंत्री दादा भुसे यांनी ट्विट करीत म्हंटले आहे की, राज्यात सध्या काही ठिकाणी पेरणीला सुरुवात झाली असून 22 जुन पर्यंत राज्यात सुमारे 27 टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच तारखेपर्यंत 38 टक्के पेरण्या झाल्या होत्या. शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या दिनांक 22 जून 2021च्या साप्ताहिक हवामान अंदाजानुसार पुढील आठवड्यात पश्चिम मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील आठवड्यातील हवामानाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवांनी पेरणी करावी. अशी माहिती कृषिमंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून दिली आहे.
दुबार पेरणीचे संकट
राज्यातील विविध भागात पावसाची आंधळी कोशिंबीर सुरु आहे. काही ठिकाणी हलका ते माध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. पावसाच्या या खेळामुळे मात्र शेतकरी अडचणीत सापडताना दिसत आहे. सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर घोंगावताना दिसत आहे.