हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यातही नाशिक जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गोदावरीला आलेल्या पुराचा फटका सर्वाधिक वैजापूर तालुक्याला बसला आहे. स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर वरून जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
वैजापूर तालुक्यात जाऊन स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र अनेक ठिकाणी जायला रस्ताच नसल्याने पाहणीसाठी त्यांना ट्रॅक्टरचा सहारा घ्यावा लागला. अशा पद्धतीने जाऊन आधिकर्यांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या संदर्भांत सूचना केल्या. वैजापूर तालुक्याचे तहसीलदार राहुल गायकवाड, गटविकास अधिकारी के.टी.जाधव, पोलीस अधिकारी शरदचंद्र रोडगे यांनी सहभाग घेतला.
दरम्यान वांजरगावाजवळील आणि सराला बेटच्या परिसरात असलेल्या शिंदे वस्तीला पुराचा वेढा पडला आहे. या भागात बचाव पथके दाखल झाली आहेत. गोदावरी नदीला पूर आल्यावर शिंदे वस्तीला पुराचा वेढा पडतोच. या वस्तीवर 45 कुटुंबातील 380 नागरिक वास्तव्यास आहेत. सोबतच 309 पाळीव जनावरे सुद्धा आहेत. विशेष म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना सुरक्षितस्थळी रवाना होण्याची विनंती केली, मात्र सद्या वस्तीवरील घरापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने तेथील नागरिकांनी वस्तीवरच थांबण्याची भूमिका घेतली आहे. मात्र अचानकपणे पाण्याचा वेग वाढल्यास बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करून नागरिकांना बाहेर काढण्याची तयारी प्रशासनाची आहे.