हॅलो कृषी ऑनलाईन : मागील काही दिवसात सोयाबीन ला विक्रमी ११ हजारांचा भाव मिळाला होता . यंदाच्या खरिपात मात्र सोयाबीनचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसातून वाचवून जे काही सोयाबीन हाती लागले आहे त्याला चांगला भाव मिळावा एवढीच काय ती अपेक्षा शेतकऱ्याला लागून आहे. सध्याचा बाजारातील सोयाबीनचा दर पाहता केवळ ३०००-५००० च्या आसपास आहे. त्यामुळे शेतकरी सोयाबीन साठवून नंतर विक्री करण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. एका गावात सोयाबीन ला १०००० चा भाव दिला तरच सोयाबीन विक्रीस कढणार असल्याची भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. एव्हढेच नाही तर त्या गावाच्या वेशीवर तसा फलकही लावण्यात येणार आहे.
सोयाबीन दरावर गावकऱ्यांनी काढला तोड
हे सर्व वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल असं कुठलं गाव असेल ? तर त्या गावाचं नाव आहे कुंभारगाव. सोयाबीन ला चांगला भाव मिळवा यातही येथील शेतकऱ्यांची एकजूट झाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दराबाबत स्वतःच तोड काढला आहे. सोयाबीनच्या दरात दिवसागणिक चढ-उतार पाहवयास मिळत आहे. आता सण तोंडावर असल्याने सोयाबीनची आवक ही वाढणारच असा अंदाज व्यापाऱ्यांनी बांधलेला आहे. मात्र, परस्थिती कितीही बेताची झाली तरी सोयाबीनला प्रति क्विंटल 10 हजाराचा दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री न करण्याचा निर्णय कुंभारगाव येथील शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.
कुंभारगावात अधितर शेतकरी हे अल्पभुधारक आहेत. त्यामुळे नगदी पीकावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. यातच सोयाबीन या मुख्य पीकाचे दर हे घसरत आहेत. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनला 10 हजाराचा दर मिळालेला होता. मात्र, हे दर स्थिर तर राहिलेच नाहीत शिवाय यामध्ये कमालीची घट झालेली आहे. या मुख्य पिकाची विक्री ही कवडीमोल दरात झाली तर भविष्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा सवाल उपस्थित झाल्याने गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
सध्या सोयाबीनची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातच पावसाने गेल्या आठ दिवसांपासून उघडीप दिलेली आहे. त्यामुळे काढणी-मळणी ही कामे शेतकरी उरकून घेत आहे. पण सोयाबीनला योग्य दर नसल्याने शेतकऱ्यांची निराशा ही कायम आहे. सध्याच्या दरानुसार उत्पादनावर झालेला खर्चही पदरी पडणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी गावच्या प्रवेशद्वारावरच ‘ सोयाबीन घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी दर 10 हजार झारल्याशिवाय फिरकू नये’ अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहे. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यासाठी हा नियम ऐच्छिक असणार आहे.