हॅलो कृषी ऑनलाईन : नेवासा तालुक्यात सुरू असलेल्या लाळ्या खुरकूत,घटसर्प रोगाच्या प्रादुर्भावने जनावरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत सात गावात सुमारे 103 जनावरांचा मृत्यू झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. जनावरांच्या मृत्यूनं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
नेवासा तालुक्यातील जेऊर, हैबती कुकाना, नांदूर शिकारी, भेंडा खुर्द आणि बुद्रुक, देवगाव गावात लाळ्या खुरकूतच्या साथीने जनावरांचा मृत्यू होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 103 जनावरं दगावली आहेत. त्यात देशी गाई पाच व दोन खिल्लार वगळता इतर 96 जनावरं संकरित आहेत. या आजाराने दोन पेक्षा अधिक जनावरे बाधीत झाली आहेत.
जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर सुनिल ठोंबरे यांच्या पथकाने या भागात तातडीने लसीकरण सुरू केले आहे. आतापर्यंत सात उद्भवलेल्या गावातील पाच हजार पाचशे त्रेसष्ट जनावरांना लाळ्या खुरकूत घटसर्प चे लसीकरण केले आहे. पशुसंवर्धन विभागाचे साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र कोरोनामुळे दूध व्यवसाय अडचणीत आहे. शेतीलाही अनेक संकटांना सामोरे जावे लागत असताना लाळ्या खुरकूत, घटसर्प यांच्या साथीनं अचानक जनावरांचा मृत्यू होऊ लागल्याने शेतकरी आणि पशुपालकांनी मध्ये चिंता व्यक्त केली जात आहे
गावनिहाय मृत्यू
जेऊर हैबत्ती -50
कुकाणा -5
भेंडा बुद्रुक -8
भेंडा खुर्द -23
नांदूर शिकारी -6
तरवडी -6
देवगाव -5