हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या खरीप हंगामात 21 मे पूर्वी कापूस बियाणे विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. मात्र तत्कालीन कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी. निर्बंध अचानकपणे शिथिल केले आणि एक मेपासून बियाणे विक्रीला मान्यता दिली होती. मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र बियाणे विक्री एक महिना उशिरा चालू होणार आहे. राज्यात कापूस बियाणे विक्री वर यंदादेखील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बियाणे उत्पादक कंपन्या 10 मे पासून वितरकांना पुरवठा करतील. मात्र बोंडअळीचा धोका विचारात घेता शेतकऱ्यांना बियाणांची प्रत्यक्ष विक्री एक जून पासून सुरू होणार आहे.
महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा 2009 मधील तरतुदींचा आधार घेत कृषी विभागाने या तारखा निश्चित केल्या आहेत. मात्र या तारखांचे उल्लंघन झाल्यास कंपनी वितरक किरकोळ विक्रेत्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असे आदेशात स्पष्ट केले आहे.
राज्यात 2017 मध्ये गुलाबी बोंड अळीची मोठी साथ आली होती. बियाणे लवकर उपलब्ध झाल्यास त्याची लागवड देखील लवकर होते त्यामुळे पुढे लागवडीचे वेळापत्रक थेट बोंड अळीच्या जीवन चक्राला पोषक ठरते त्यामुळे 2018, 2019 आणि 2020 या तीनही हंगामात राज्यात अभियान हाती घेण्यात आलं होतं. यंदादेखील बोंड आळी साठी प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील असं कृषी विभागाचे म्हणणे आहे.
दरम्यान कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या 10 मेपासून वितरकांना पुरवठा करण्यास सुरुवात करतील. वितरकांना 15 मे पूर्वी कोणत्याही किरकोळ विक्रेत्याला बियाणांचा पुरवठा करता येणार नाही. तसेच पूर्वहंगामी कपाशी लागवड टाळण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांना एक जूनपूर्वी शेतकऱ्यांना बियाणे विकता येणार नाहीत असे आदेश कृषी विभागाने जारी केले आहेत.