हॅलो कृषी ऑनलाईन : खरतर सोयाबीन हे सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. यंदा मात्र अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीन पिकाची मोठी नासाडी झाली आहे. त्यातच आता पावसाने उघडीप दिल्यानंतर उरलं सुरलं पीक शेतकरी पदरात पडून घेतो आहे. मात्र सोयाबीनला सध्या मिळणाऱ्या दराइतकाच त्याच्या काढणीसाठी दर द्यावा लागतो आहे. शिवाय शेतमाल सुव्यवस्थित बाजारापर्यंत नेण्याचा खर्चही वेगळाच… त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘चार अणेंची कोंबडी आणि बारा अणेंचा मसाला’ अशी काहीशी झाली आहे.
बाजारपेठेत सोयाबीनला 5 हजाराचा दर मिळतोय तर दुसरीकडे हेच सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना एकरी 5 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. पावसामुळे अद्यापही सोयाबीन हे पाण्यातच आहे. त्यामुळे मजुरी वाढली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असेल तर यंत्राच्या सहाय्याने काढणी कामे उरकून घेण्याचा सल्ला कृषीतज्ञ देत आहेत.सोयाबीन काढणीच्या सुरवातीला एकरी 3 हजार रुपयांप्रमाणे मजुरी आकारली जात होती पण आता हे पीक पाण्यात असल्याने मजूरीचे दर वाढत आहेत. सोयाबीन काढणीला एकरी 5 हजार रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे यंदा सर्वकाही पाण्यातच असल्याची शेतकऱ्यांची भावना झालेली आहे.