हॅलो कृषी ऑनलाईन : अल्पावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीन पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे. मात्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. सततच्या पावसामुळे आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे सोयाबीन पिकावर पिवळ्या मोजॅक रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याचे चित्र आहे. वावरातले हेच चित्र पाहून शेतकऱ्याने सोयाबीन पीक उपटून टाकले आहे.
राज्यातल्या अनेक भागात सोयाबीनवर पिवळ्या मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. उस्मानाबाद येथे देखील काही वेगळी परिस्थिती नाही. उमरगा तालुक्यातील काही शेतकरी सोयाबीन उपटून टाकत आहेत. उमरगा तालुक्यात सतत लागून राहिलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान केल्याचे पाहायला मिळत आहे. उडीद, मूग, सोयाबीन या पिकात पाणी थांबल्यानं पिके पिवळी पडून नुकसान होत आहे. त्यासोबतच गोगलगायचा देखील मोठा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळ बऱ्याच ठिकाणी पिकं हाताबाहेर गेली आहेत. उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार येथील घुडू मुल्ला या शेतकऱ्याने सोयाबीन झाडाला फळ लागत नसल्यानं ते उपटून टाकले आहे.
सोयाबीनला शेंगाच नाहीत
याबाबतीत माहिती देताना मुल्ला यांनी सांगितले की, ” माझ्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण सोयाबीन पिकं पिवळे पडले आहे. तसेच सोयाबीनला फळ लागले नाही. सोयाबीनला फळ लागलं नसल्यामुळं मी ते उपटून टाकले. 3 हजार 600 रुपयांची सोयाबीनची पिशवी खरेदी केली होती. तसेच दीड हजार रुपयाचे खत देखील सोयाबीनला टाकले होते. तसेच आता तीन हजार रुपये देऊन सोयबीन उपटून टाकत आहे. अद्याप नुकसान भरपाईच्या यादीत माझं नाव नसल्याची माहिती देखील मुल्ला यांनी दिली.
फवारणीचा उपयोग नाहीच
पाऊस लागून राहिल्यानं पिकाची अंतरमशागत देखील करता आली नाही. तसेच फवारण्या देखील केल्या. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण फवारणी केल्यानंतर दोन तास पाऊस न येणं गरजेचं असते. पण लगेच पाऊस आल्यानं फवारणीचा काही उपयोग झाला नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.