हॅलो कृषी ऑनलाईन : संत्र्याची फळगळ नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने अख्खी संत्रा बाग उखडून काढल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी तात्काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी संवाद साधला त्यानंतर या प्रश्नावर राज्यस्तरीय समितीची गठण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य स्तरीय संशोधन समितीमधील सदस्यांची घोषणा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही समिती फळगळ मागील नेमक्या कारणांचा शोध घेऊन त्यानुसार उपाययोजनांबाबत शिफारस करणार आहे अशी माहिती आहे.
याबाबत बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले की, संत्रा पट्ट्यात फळगळ नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकलया परंतु तसे न करता शेतकऱ्यांनी संयम राखावा. अचलपूर येथे कृषि विद्यापीठ मार्फत स्वतंत्र संत्रा संशोधन केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्या सोबतच शेतकऱ्यांचा दबावगट राहावा याकरिता शंभर शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यात येईल. त्यांच्याकरिता त्या त्या भागात कार्यालय देखील कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री व कृषी सचिवांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निश्चितच या समस्येचं निराकरण होईल.
अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 1 लाख हेक्टर क्षेत्र हे सांत्र्याचं आहे. मागील काही दिवसांपासून संत्रा वर मोठ्या प्रमाणात फळ गळ होत आहे. या फळ गळी मुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी बागच उखडून टाकण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर संत्रा वर संशोधन कामी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत स्वतंत्र उद्यान विद्या विभाग आहे. परंतु या दोन्ही यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे परिणामी फळगळ नियंत्रणात येणारच नाही या भावनेतून शेतकऱ्यांनी अखेर संत्रा बाग काढून टाकण्यावर भर दिला. नांदगाव खंडेश्वर, वरुड, मोर्शी भागात हजारो संत्रा झाड शेतकऱ्यांनी काढून टाकले आहेत. त्यासोबतच केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था तसेच कृषी विद्यापीठाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.