हॅलो कृषी ऑनलाईन : रेल्वेबाधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन लढ्यास यश आले आहे. कराड तालुक्यातील बाबरमाची, सयापूर, पार्ले, हजारमाची, कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाच पट मोबदला मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच शेतकऱ्यांना रेल्वेकडून गुंठ्याला साडेपाच लाखांचा मोबदला देण्यात येत आहे. हा आंदोलनाचाच विजय आहे, अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे सचिन नलवडे यांनी दिली.
तालुक्यातील बाबरमाची येथील शेतकऱ्यांच्या रेल्वे बाधित क्षेत्राला एक गुंठ्याला साडेपाच लाखांच्या धनादेशाचे वितरण प्रांताधिकारी उत्तम दिघे, नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, मनोज ढाणे, अनिल डुबल, कृष्णा मदने, प्रसाद धोकटे, शंकर आतकरे, अनिल घराळ, योगेश झांबरे, सुनील जाधव या रेल्वे लढ्यातील प्रमुखांच्या हस्ते देण्यात आला.
पुणे ते मिरज येथे रेल्वेच्या दुहेरीकरणांसाठी 23 गावातील जमीन संपादित करण्याचे काम सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांना खासगी वाटाद्वारे जमीन खरेदी घेत आहोत. चालू रेडीरेकनर दराच्या पाचपट पैसे देत आहोत. त्याप्रमाणे सदरचे खरेदीखत चालू असल्याचे कराडचे प्रातांधिकारी उत्तम दिघे यांनी सांगितले.