हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांचं ऊस बील मिळावं या मागणीसाठी आज सांगलीच्या तासगावमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यालयावर भव्य असा शेतकरी मोर्चा काढण्यात आला. यावेळी खासदारांना शेतकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. तर कोणताही तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
खासदारांनी ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा
भाजप खासदार संजय काका पाटील यांच्या नागेवाडी आणि तासगाव साखर कारखान्याने 35 ते 40 कोटी रुपयांचं शेतकऱ्यांचं ऊस बिल अद्याप ही दिले नाही अनेक वेळा आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला होता. यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी ऊस बिल लवकरात लवकर देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा दिले होते. पण अद्याप शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली तासगावमध्ये भव्य असा मोर्चा खासदारांच्या कार्यलयावर काढला. यावेळी मोर्चा दरम्यान पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ही लावला होता. यावेळी आंदोलन ठिकाणी खासदार संजय काका पाटील आले. आंदोलकांची व्यथा ऐकून घेतल्या.येत्या 15 दिवसात शेतकऱ्यांना बिलं दिली जातील.असे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले आहे.कित्येक दिवस होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे भव्य मोर्चा काढल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितलं.