हॅलो कृषी ऑनलाईन : विदर्भात संत्र्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या पिकाला अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणात बहर आला आहे. मात्र सध्या संत्रा पिकावर “तडक्या” नावाचा रोग आलाय. त्यामुळे संत्रा पिकाची मोठ्या प्रमाणात फळगळ होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. कृषी विभागाकडून संत्रा पीक घेणाऱ्या उत्पादकांना योग्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती केली आहे .
आंबट गोड चवीसाठी संत्राची ओळख आहे. संत्राचं सर्वाधिक उत्पादन विदर्भातील अमरावतीमध्ये होतं. म्हणून या परिसराला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल जातं. इथला संत्रा देश विदेशात देखील विकला जातो. मात्र सध्या संत्रावर तडक्या नावाचा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. या रोगामुळे संत्राची गळती होतेय. तर संत्राला भेगा पडताहेत.
कृषी विभागाचं मार्गदर्शन गरजेचं
सद्या स्थितीत या रोगाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचं 25 ते 30 टक्के नुकसान झालंय. वेळेत कृषी विभागाचं मार्गदर्शन न झाल्यास, संत्राचं जास्त नुकसान होण्याची भीती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सतावते आहे.मागील वर्षी टाळेबंदीमुळे संत्राचे भाव घसरले होते. परिणामी बेभाव संत्रा विकावा लागला. यावेळी संत्रावर रोगाचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होत आहे. संत्रा उत्पादकांना गरज आहे ती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची. कृषी विभाग मात्र संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.