हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी लागणारा खतांचा तसेच बि-बियाणांचा तुटवडा भासणार नाही. याबरोबरच बोगस खतांची व बि-बियाणांची विक्री होणार नाही, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले. खरीप हंगाम-2022 पुर्वतयारी आढावा बैठक सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी पाटील बोलत होते. या बैठकीला खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार महादेव जानकर, आमदार अरुण लाड, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सह संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव शेळके आदी उपस्थित होते.
तुर पिक लागवड वाढविण्यावर भर द्यावा
पाटील म्हणाले, खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी होते. सोयाबीनला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बियाणांसाठी जतन केलेले बियाणे विकले आहेत. सोयाबीन बियाणांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी. मराठवाड्यात तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. त्याच पद्धतीने जिल्ह्यातही तुर पिक लागवड वाढविण्यावर कृषी विभागाने भर द्यावा, यासाठी जनजागृती करावी.
असेही पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले.