हॅलो कृषी ऑनलाईन : अफगाणिस्तानवर नाट्यमयरित्या तालिबानने कब्जा केला आहे. याचे पडसाद भारतात देखील जाणवायला सुरू झाले आहेत. भारतातून अफगाणमध्ये निर्यात होणाऱ्या उत्पादनांवर आता छाप बसला आहे. सोलापुरातील माळशिरस आणि करमाळा तालुक्यातील केळीच्या निर्यातीवर याचा परिणाम झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटक केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अफगाणिस्तान हा इराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन केलंय. मात्र सध्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. भारतातून अफगाणिस्तानात दर वर्षी किमान 30 टक्के केळी निर्यात होते. दरम्यान अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली आहे. वेळीच सुधारणा न झाली नाही तर, त्याचा आणखी फटका केळी निर्यातदार शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
आधीच कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत असतानाच अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे केळी उत्पादकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे मागील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांना वाहतूक बंदीचा मोठा बसला होता. लाॅकडाऊन शिथील झाल्यानंतर केळी दरात तेजी निर्माण झाली आहे. परंतु अफगाणिस्तान येथील तालिबानी वर्चस्वानंतर निर्यात थांबली आहे. जोपर्यंत तेथील परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत निर्यात चालू होण्याची शक्यता कमी आहे.