हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी बदलत्या हवामानामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले. मात्र खरिपानंतर आता रब्बीच्या पिकांचीही तीच अवस्था झाली आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी हरभऱ्याचा पेरा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केला होता. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात हरभरा पिकाला बसला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील हरभऱ्याची लागवड केली. मात्र किनवट तालुक्यातल्या शिवारात हरभऱ्याला फळधारणाच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने हरभऱ्याच्या उभ्या पिकावर कुळव घातला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा हरभऱ्याला फटका
खरीपट झालेले नुकसान रब्बीत भरून काढण्याच्या आशेने शेतकऱ्यांनी यंदा गहू, ज्वारी पिकाला फाटा देत हरभरा पिकाची लागवड केली. सुरुवातीला वातावरण पोषक होते मात्र नंतर कधी अवकाळी पाऊस, कधी गारपीट तर कधी ढगाळ वातावरण त्यामुळे हरभऱ्याला फळधारणाचं झाली नाही तर काही ठिकाणी किडींचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. म्हणून या सर्व समस्यांना वैतागून शिवाजी बोईनवाड यांनी पिकांवर वखर फिरवली.
दरम्यान फळधारणा झाली नाही याबाबत माहिती देताना कृषी विभागाने सांगितले की, एकाच पीक पद्धतीमुळे फळधारणा झाली नाही. त्याच पिकाचा पेरा दरवर्षी केल्यामुळे फळधारणा झाली नसल्याचे विभागाने सांगितले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार बांधावर वेगळीच स्थिती असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.