हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा ऊस हंगाम लांबल्याचे चित्र आहे. अद्यापही उसाचे गाळप सुरु आहे. मात्र शेतकऱ्यांना एफआरपी आणि अन्य प्रश्नाबरोबर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तो साखर कारखान्यांकडून होणाऱ्या ऊस तोडणी आणि वाहतुकीचा… या दोन्ही गोष्टींकरिता शेतकऱ्यांकडून आधिकचा दर आकाराला जात असल्याची बाब एका तपासणी अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनीधींनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.
स्थानिक पातळीवर ऊसतोडणीपासून ते वाहतूक आणि एफआरपी रकमेबाबत शेतकऱ्यांची लूट होत आहे. शिवाय तोडणी व्हावी या उद्देशाने शेतकरीही अधिकची रक्कम देऊन फडातला ऊस बाहेर काढतो. मात्र, ही लूट आता मोठ्या प्रमाणात वाढली असून संबंधित साखर काखान्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे बी.जी.पाटील, महेश जाधव, विशाल पाटील, अंकूशचे धनाजी चुडमुंगे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याची मागणी केली आहे.
साखर सहसंचालकांनी विशेष लेखापरिक्षकांची नेमणूक करुन यासंबंधी तपासणी करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार यामध्ये घोळ झाल्याचे समोर आले आहे. बेकायदेशीर खर्चाच्या रकमा ह्या हिशोबातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कारखान्यांना आगोदरचे हिशोब रद्द करायला भाग पाडून सुधारित दराने एफआरपी देण्याचे आदेश दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. साखर कारखान्यांनी तयार केलेली ऊस तोडणी मजूरांची टोळी, वाहतूकीचा खर्च या बाबींची तपासणी करण्याची मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली आहे.