हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. कोकण , मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसामुळे मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भोर तालुक्यातील वीसगाव खोऱ्यातील कळकवाडी, शेरताटी,धनावडे वाडी, वरवडी, डायमुख, नेरे, पाले पाटण वाडी वरवडी बुद्रुक पांडवाडा, राजवाडा अंबाडे, बलवडी, गोकवडी, पळसोशी, बाजारवाडी निळकंठ उतरवली कान्हावडी खानापूर भाबवडी या परिसरात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडत होता. या पावसाने भात खाचरे , भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
वीसगाव खोऱ्यात पावसाने झोडपले यामुळे कोळेवाडी येथील अंबाडे -कोळेवाडी रस्ता वाहून गेला आहे. खडकवाडी येथील अनेक शेतकऱ्यांचे भातखाचरे दोन छोटे बंधारे वाहून गेले आहेत. शेतकऱ्यांनी नुकतीच भात लावणी केली होती ती वाहून गेली आहे शेतातील, घेवडा, पावटा, भुईमूग, कडधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत अशी मागणी वीसगाव खोऱ्यातील शेतकरी करत आहेत.