हॅलो कृषी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात येथील आनंद येथे झालेल्या ‘नैर्सगिक शेती’ संमेलनात संबोधित केले. यावेळी नैसर्गिक शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले. रासायनिक खतांचा वापर केल्याशिवाय उत्पादनात वाढ होत नाही हा सर्वात मोठा गैरसमज आहे. असाच रासायनिक खतांचा वापर होत राहिला तर मात्र, शेती व्यवसयाचे मोठे नुकसान होणार आहे. आता हीच योग्य वेळ आहे असे म्हणत मोदींनी नैसर्गिक शेतीकडे देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.
रासायनिक खतांवर आणि किटकनाशकांवर होणार नाही अधिक खर्च
नैसर्गिक शेतीमुळे शेतकऱ्यांना रासायनिक खतांवर आणि किटकनाशकांवर अधिकचा खर्चही करावा लागणार नाही. मात्र, हा बदल स्विकारणे ही आता काळाची गरज झाली आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी बदल स्वीकारलेला आहे. हाच बदल करुन अल्पभुधारक शेतकऱ्यांनी आपले उत्पादन वाढवणे गरजेचे असल्याचे मोदींनी सांगितले.
‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय
केवळ उत्पादन वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर वाढत आहे. मात्र, रासायनिक खतांच्या वापराची गरजच मुळात चुकीच्या शेती पध्दतीमुळे शेतकऱ्यांवर आली आहे. आता मुळाशी जाऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे. उत्पादनावाढीसाठी खतांचा वापर आणि किटनाशकांच्या फवारणीसाठी पुन्हा औषधांचा वापर यामध्येच शेतजमिनीचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे कमी खर्चात अधिकचे उत्पादन घेण्यासाठी ‘झिरो बजेट शेती’ हाच पर्याय आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने का होईना शेतकऱ्यांनी याचा अवलंब करण्याचे अवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.