हॅलो कृषी ऑनलाईन : जूनमध्ये १०० रुपये किलो पर्यंत गेलेला टोमॅटोचा भाव ४० रुपयांवर आला आहे. टोमॅटोच्या दरात ६० टक्के घट झाली आहे. टोमॅटोची लाली उतरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांमध्ये नाराजी आहे. टोमॅटोच्या दरामध्ये जून महिन्यात १५८. ७८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती. त्यामुळे टोमॅटो सामान्य माणसाच्या बजेटच्या अवाक्याबाहेर गेला होता. मात्र आता टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे.
बटाटयाचा दर मात्र स्थिर
एकीकडे टोमॅटोच्या दरात घसरण झाली असताना दुसरीकडे बटाट्याचे दर मात्र स्थिर आहेत. जुलै महिन्यात बटाट्याच्या किमतीत २ टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ २३. ८६ टक्के झाली आहे. विशेषतः दक्षिण भारतात बटाट्याला चांगली मागणी आहे.
म्हणून टोमॅटोच्या दरात वाढ
देशभरातील टोमॅटो पिकावर उष्णतेच्या लाटेचा परिणाम झाला होता. हवामानातील बदलामुळे मे आणि जूनमध्ये टोमॅटो पिकावर किटकांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. पुरवठा देखील कमालीचा घटला होता. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याची माहिती भारतीय भाजीपाला उत्पादक संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे यांनी एका टीव्ही माध्यमांशी बोलताना दिली. यंदा मार्चमध्ये टोमॅटोच्या लागवडी कमी झाल्या होत्या. त्यामुळं मे आणि जूनमध्ये टोमॅटोच्या दरात वाढ होत होती. मात्र, सध्या पाऊस असल्यानं उष्णतेचा फटका बसणार नाही. पाऊस पडत असताना दुसरीकडे उत्पादनातही वाढ झाली आहे. शिवाय इतर राज्यातून टोमॅटोचा चांगला पुरवठा होत आहे. यामुळं जुलैमध्ये किंमती कमी झाल्या आहे. बाजारात आवक वाढल्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर झाला आहे.