हॅलो कृषी ऑनलाइन: आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव मार्केट यार्डात टोमॅटोची 30 हजार 500 क्रेट्स आवक झाली होती. मात्र या टोमॅटो ला अवघा किलोला ३-५ रुपये इतका दर मिळाला. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कमालीची नाराजी पाहायला मिळाली.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदेशात टोमॅटोची जास्त निर्यात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्र सरकारकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला आहे.
या कारणामुळे देशांतर्गत मागणी घटली
–नाशिक, नगर, पुणे, औरंगाबादसह राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच राजस्थान, बंगलुरू आणि गुजरात या ठिकाणी प्रामुख्याने स्थानिक टोमॅटोची मोठी आवक होत आहे.
–या कारणामुळे टोमॅटो उत्पन्नाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी नसल्याने आणि गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरावर होताना दिसते आहे.
–लासलगावसह पिंपळगाव बसवंत, वणी, चांदवड आणि येवला बाजार समितीत टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेट्सला 60 ते 100 रुपयांपर्यंत म्हणजे तीन ते पाच रुपये किलो इतका बाजार भाव मिळतोय.
–कमी दरामुळं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला वाहतूक, मार्केटमधील चढ-उतर, शेतातून तोडणीचा खर्चही भरून निघत नाही, अशी स्थिती आहे.
निर्यातीसाठी केंद्राकडं पाठपुरावा सुरु
जास्तीत जास्त टोमॅटोची निर्यात इतर राज्यांसह विदेशात कशी वाढवता येईल यासाठी टोमॅटो निर्यातदार व्यापाऱ्यांनी लासलगांव बाजार समितीकडे मागणी केली आहे. लासलगांव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी आर्थिक संकटात सापडलेल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार नव्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदावर वर्णी लागलेल्या डॉक्टर भारती पवार यांच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश यासह आखाती देशात टोमॅटो कसा जास्त निर्यात करता येईल यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु केला आहे.