हॅलो कृषी ऑनलाईन : सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे .या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर येथे महाबळेश्वर… पण याच महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना तुम्हाला स्ट्रॉबेरीचा खच पडलेला दिसेल. राज्यावर आलेल्या अवकाळी पावसाच्या संकटाने आता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे.अवकाळी पाऊस पडून चार ते पाच दिवस झाले असून, वातावरण पूर्णतः बदलून गेलं आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जावळी तालुक्यातील भुतेकर ,पाचगणी , भीलार परिसरातील अनेक हेक्टरवरील स्ट्रॉबेरी शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा
पावसानंतर शेतातच स्ट्रॉबेरी सडली आहे. काही ठिकाणी स्ट्रॉबेरी खराब झाली आहे. अशा किमान 50 एकरहून अधिक स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी ही बांधावर टाकून दिली आहे. करोडो रुपयांचे नुकसान जावळी महाबळेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. या स्ट्रॉबेरीचे नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असले तरी जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. स्वतः साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महाबळेश्वर मध्ये जावून शेतकऱ्याची भेट घेवून स्ट्रॉबेरीच्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.
मात्र सध्या असलेलं ढगाळ वातावरण, दाट धुके आणि मुसळधार पावसाने स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे नवीन वर्षाचा स्वागताला महाबळेश्वर येणाऱ्या पर्यटकांना स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार का असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही.