हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात काही मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून खरीप हंगामाच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल असतो. मात्र यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पेरणीबाबत कृषी विद्यापीठाने महतवाची माहिती दिली आहे. कृषी विद्यापीठाच्या निर्देशानुसार बियाणे उगवणीसाठी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरासरी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडणे आवश्यक आहे. जो पर्यंत 80 ते 100 मि.मी पाऊस होत नाही तोपर्यंत सोयाबीन पेरणी करु नका, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
… अन्यथा दुबार पेरणीचं संकट
जो पर्यंत वाशिम जिल्ह्यामध्ये 80 ते 100 मि.मी. पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी एका टीव्ही माध्यमाशी बोलताना केले आहे. यापेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्याने जमिनीच्या उष्णतेमुळे बियाणे अतिशय कमी प्रमाणात अंकुरते व बियाणे जळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार बियाणे पेरण्याची वेळ येवू शकते, असं शंकर तोटावार म्हणाले.
बसू शकतो आर्थिक फटका
दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्यास यामध्ये त्यांचे पैसे आणि वेळपण अधिक खर्च होतो. याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.दुबार पेरणीचा खर्चही शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी 80 ते 100 मि.मी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. असे आवाहन कृषी विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.