हॅलो कृषी ऑनलाईन : मागच्या दोन तीन दिवसांपासून राज्यातल्या बहुतांशी भागात पावसाने (Weather Update)
दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, विदर्भातल्या काही भागात पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान असाच पाऊस पुढचे दोन तीन दिवस सक्रिय राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
मुसळधार ते अतीमुसळधार
येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
कुठे किती पाऊस ?
काल दिनांक नऊ रोजी सर्वाधिक पावसाची नोंद ही रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा (Weather Update) तालुक्यात झाली आहे. लांजा मध्ये 330 mm पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर हवामान तज्ञ के एस होसाळकर यांनी आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 182.7 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात पाऊस झाला असून 113 मिलिमीटर पावसाची नोंद इथं करण्यात आली आहे. चिपळूण मध्ये सर्वाधिक 195 मिलिमीटर पावसाची नोंद मार्ग तामणे इथे करण्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जवाहर येथे 86 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यामध्ये लवासा इथं सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. लवासामध्ये आज 239 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.