हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातल्या अनेक भागात पावसाने (Weather Update) उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतीकामाला वेग आला आहे. पावसाची आधीक काळ उघडीप मात्र तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक मनाली जात आहे. जुलै महिन्याच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी शेवटच्या आठवड्यापासून आतापर्यंत पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे ३-४ दिवस राज्यातल्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस (Weather Update) हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यातही कोकणात जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. अशी माहिती होसाळीकर यांनी दिली आहे. त्यामुळे कोकणातल्या भात उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटणार आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे गेला असून, पंजाबच्या अमृतसर पासून, बरेली, बहारीच ते पूर्वेकडे हिमालयाच्या पायथ्याकडे सक्रिय आहे. छत्तीसगड पासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. रायलसीमा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तमिळनाडूच्या किनाऱ्याकडे सरकली आहे.
‘या’ भागाला यलो अलर्ट
2 ऑगस्ट : आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि अमरावती या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या भागाला यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
3 ऑगस्ट – दिनांक 3 ऑगस्ट रोजी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, हिंगोली या भागात मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे या भागाला यलो अलर्ट दिनांक 3 ऑगस्ट रोजी हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
4 ऑगस्ट – तर दिनांक 4 ऑगस्ट रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड आणि जालना या भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची (Weather Update) शक्यता आहे. दिनांक 4 ऑगस्ट साठी या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे.