हॅलो कृषी ऑनलाईन : काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने (Weather Update ) राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. राज्यात काल (१) नाशिक, औरंगाबाद भागात जोरदार पाऊस बरसला. दरम्यान हवामान खात्याकडून अत्यंत महत्वाची माहिती समोर आली असून सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी गुरुवारी (ता. १) ऑनलाइन पत्रकार परिषदेत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज जाहीर करताना हि माहिती दिली आहे.
कशी असेल हवामान स्थिती ?
हंगामाच्या अखेरच्या महिन्यात देशभरात १०९ टक्के पावसाचा अंदाज हवामान (Weather Update ) विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या मध्यानंतर सुरू होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात चांगल्या पावसाची शक्यता असून, ईशान्य भारत, पूर्व भारतातील राज्ये, आणि देशाच्या अतिउत्तर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यातच सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाला पोषक प्रणाली तयार होत असल्याने मॉन्सूनचा राजस्थानातील परतीचा प्रवास सुरू होणार नसल्याचे दिसून येत आहे. पूर्व भारत, ईशान्य भारत, जम्मू, काश्मीरसह लगतच्या राज्यात, तसेच मध्य भारताच्या काही भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारत आणि वायव्य भारत वगळता उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात ला-निना स्थिती वर्षाअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असून, इंडियन ओशन डायपोल (आयओडी) नकारात्मक राहण्याचे संकेत वर्तविण्यात आले आहेत.
आज कोणत्या भागात कसा असेल पाऊस ?
आज कोकण विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (Weather Update ) होणार असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून तुर्रालाक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. तर मराठवाडा आणि विदर्भांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. असा अंदाज पुणे वेधशाळेकसून वर्तवण्यात आला आहे.