हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात सध्या पावसानं उघडीप दिली असून काही ठिकाणी ढगाळ हवामान तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये कोसळतो आहे. दरम्यान हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 27 जुलै नंतर पुढच्या दोन-तीन दिवसात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. शिवाय मुंबई, ठाणे विभागात तीव्र हवामानाचे इशारे नाहीत अशी ही माहिती हवामान खात्याने दिली असल्याचे के.एस. होसाळीकर यांनी सांगितले आहे.
राज्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट
आज दिनांक 27 रोजी राज्यातल्या काही जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागामध्ये विजांच्या कडकडाटसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या जिल्ह्यांमध्ये अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे तर इतर भागाला कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये.
दिनांक 28 रोजी मात्र अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला या भागात उद्या म्हणजेच 28 तारखेला विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान इतर राज्यांचा विचार करता इतर राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसून येत आहे विशेषतः आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या भागामध्ये 29 ते 30 जुलै दरम्यान जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.