हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या वर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात उष्णतेचा पारा ४० अंशांच्या वर गेला होता. मात्र आता लवकरच देशातल्या नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळणार आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या असनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कमी दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून मान्सून वेळेआधीच देशात हजेरी लावण्याचे संकेत आहेत.
हवामान खात्याचे तज्ञ के. एस. होसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता असून यावर्षी केरळमध्ये मॉन्सूनचे आगमन 27 मे रोजी ± 4 दिवसांच्या मॉडेल त्रुटीसह होण्याची शक्यता आहे. अशी माहितीही होसाळीकर यांनी दिली आहे. दरम्यान यापूर्वी 2021 रोजी 3 जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता तर अंदाज 31 मे चा वर्तविण्यात आला होता. 2020 रोजी एक जून रोजी मान्सून केरळ मध्ये आला होता तर पाच जून चा अंदाज 2020 ला वर्तवण्यात आला होता. आता मात्र २०२२ला 27 मे च्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आजचा हवामान अंदाज
आज दिनांक १४ मे रोजी राज्यातील वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेचे लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या नागपूर वेधशाळेच्या विभागाकडून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज दिनांक १४ रोजी यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान काल दिनांक 13 मे रोजी अकोला 43.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे.