हॅलो कृषी ऑनलाईन : येत्या 24 तासात मान्सून पाऊस अंदमानात दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. आज अनुकूल स्थिती असल्यामुळे मान्सून पावसाचं (Monsoon) अंदमान समुद्र, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिणपूर्व भागात आगमन होऊ शकतं. त्यातच केरळच्या किनारपट्टीवर येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.मान्सूनची प्रगती वेगानं होत आहे. त्यामुळे मान्सून 24 तासांत अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या पाच दिवसांत जोरदार वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातल्या ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना आणि परभणी, हिंगोली नांदेड, लातूर, उस्मानाबाद या नऊ जिल्ह्यांना 16 ते 19 मे रोजीपर्यंत चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या चार जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होईल, अशी शक्यताही वर्तवली आहे.
हवामान तज्ञ के . एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-मध्य कर्नाटकावर जमिनीपासून वर चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे,अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे पुढील 5 दिवस तामिळनाडू व कर्नाटक किनार पट्टी, केरळ व माही क्षेत्रात जोरदार पावसाची शक्यता. त्याच बरोबर उष्ण लाटांची उत्तर व मध्य भारतात शक्यता असल्याची माहितीही त्यांनी भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने दिली आहे.