हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाच्या खरिपात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. आता जरी पाऊस नसला तरी काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. सध्या कापूस पिकाला चांगला भाव मिळत आहे मात्र धुळयात एका शेतकऱ्याला भर कापसाच्या पिकात जनावरे सोडण्याची नामुष्की आली आहे.
कापसाचा बहर सुरु असतानाच गत महिन्यात पावसाचा जोर वाढला होता. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले होते हे कमी म्हणून की काय पावसाने उघ़डीप देताच कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढला. या प्रतिकूल परस्थितीमुळे बोंडांची वाढच झाली नाही. त्यामुळे उत्पादनाचा प्रश्नच उरला नाही. आता बाजारात कापसाला 9 हजाराचा दर मिळत असताना मात्र, धुळे तालुक्यातील सुभाष शिंदे यांच्या कापूस आणि कांदा पिकांत जनावरे चरत आहेत.कापूस आणि कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील कृषी विभागाने पंचनामेही केले नाहीत. लागवड, खत, बियाणे याचा खर्च वाया गेला आहे. पंचनाम्यासाठी अनेक वेळा कृषी विभागाचे उंबरठे जिझवले मात्र, अधिकऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. आता पिकांची मोडणी करुनही अधिकारी फिरकले नसल्याने नुकसानभरपाई देखील मिळणार नसल्याने रब्बीचा खर्च आणि दिवाळी साजरी करायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे.
कांद्यावर लाल्याचा प्रादुर्भाव
कांद्याचे रोप लहान असतानाच पावसाचा अधिकचा मारा झाला. शिवाय वातावरणातील बदलामुळे कांद्यावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलेली आहे शिवाय कांद्याची पात ही पिवळी पडत आहे. त्यामुळे तोडणीला आलेला कापूस आणि नुकतीच लागवड केलेला कांदा अशी दोन महत्वाच्या पिकांची मोडणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आलेली आहे. सुगीपुर्वी कांद्याची लागवड केल्यास पदरी पैसा पडतो. यंदा मात्र, लावणी करुन झाली की मोडणी करण्याची वेळ आली आहे.
कापूस आणि कांद्यातून उत्पादनाच्या आशा शेतकऱ्यांच्या मावळल्या आहेत. कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हे हतबल झाले असून हे पिक जनावरांच्या तरी पोटात जाईल म्हणून यामध्ये शेळ्या, मेंढर सोडण्यात आली आहेत. काढणीचा खर्चही परवडत नाही म्हणून हा निर्णय घेतल्याचे शेतकरी सुभाष शिंदे यांनी सांगितलेले आहे.
संदर्भ : टीव्ही ९