हॅलो कृषी ऑनलाईन : दिनांक 12 एप्रिल रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच जालना, परभणी व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
उन्हाळी भुईमूग पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. पिकाच्या आवश्यकतेनुसार व उपलब्धेनुसार पिकाला सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. उन्हाळी भुईमूग पिकात आऱ्या सुटु लागल्यास अंतरमशागतीची कामे करू नयेत.
फळबागेचे व्यवस्थापन
–नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी यामुळे कलमांची मार होणार नाही तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.
—केळी– बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. केळी बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे.
—आंबा-आंबा बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आंबा बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे. आंबा बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात. मुख्य खोडा लगत भुसा दिसून आल्यास तारेच्या आकड्याने आतील अळ्या काढून नष्ट कराव्यात व छिदामध्ये पेट्रोलमध्ये बुडविलेला बोळा किंवा क्लोरोपायरीफॉस द्रावणाचा (2 मिली प्रती लिटर पाणी) बोळा टाकावा व छिद्र शेणाने अथवा मातीने लिपून घ्यावे.
—द्राक्ष – बागेमध्ये एप्रिल छाटणी ही घड निर्मितीसाठी केली जाते. द्राक्ष बागेत एप्रिल छाटणीची पुर्व तयारी करून घ्यावी.
—सीताफळ– बागेला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. सीताफळ बागेत ठिंबक सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. नवीन लागवड केलेल्या व लहान झाडांना उन्हापासून संरक्षनासाठी सावली करावी तसेच बागेत खोडाजवळ आच्छादन करावे.सीताफळ बागेत खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भाव झालेल्या झाडाच्या जुन्या वाळलेल्या फांद्या कापून टाकाव्यात.
भाजीपाला
भाजीपाला पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाला पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.आज दिनांक 12 एप्रिल रोजी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या भाजीपाला, टरबूज, खरबूज पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
फुलशेती
फुल पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. फुल पिकात सुष्म सिंचन पद्धतीने सकाळी लवकर किंवा सायंकाळी पाणी व्यवस्थापन करावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची सकाळी लवकर काढणी करून घ्यावी.