हॅलो कृषी ऑनलाईन : एकीकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भाचा दौरा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकरिता मदत देण्यासंदर्भांत बोलत आहेत. असे असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर मदतीच्या संदर्भात लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करू, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे आश्वासन दिले आहे. रविवारी त्यांनी औरंगाबाद येथील विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातील नुकसानीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
शेतकरी आत्महत्या होऊ नये यासाठी प्रयत्न
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी विशेष योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बँकांचे कर्ज वेळेवर मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी त्यासाठी लवकरच बैठक घेणार आहेत.प्रत्येक शेतकऱ्याचा जीव सरकारसाठी मोलाचा आहे. आत्महत्या होऊच नये यासाठी करावयाच्या तत्काळ, अल्पमुदतीत व दीर्घमुदतीचे उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कटिबद्ध आहे. कुरुंदा गावाच्या पुनर्वसनाचा विषय लवकरच मार्गी लावला जाईल. असे त्यांनी स्पष्ट केले.
ओरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवणार
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. ‘एनडीआरएफ’च्या निकषांप्रमाणे मदत मिळेलच. शिवाय औरंगाबादेत सात दिवसाला पाणी मिळत आहे. ते एक दिवसाआड मिळावे म्हणून त्यासाठीच्या उपाययोजनेसाठी दोनशे कोटी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेरूळ घृष्णेश्वरबाबत मागण्यांचाही आढावा घेण्यात आला. ज्या योजना पूर्ण करणे शक्य आहे त्या प्राधान्याने पूर्ण करण्याचे नियोजन करण्याचे यंत्रणेला सूचित केले आहे.