हॅलो कृषी ऑनलाईन : आजकाल वाढत्या लोकसंख्येमुळे वडिलोपार्जित जमिनी किंवा मालमत्ता (Ancestral Land) आहे त्याच अवस्थेत आहेत. मात्र वारसा हक्काने दिवसेंदिवस त्यांचे विभाजन होत आहे. काही परिस्थितीत एखाद्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन ही त्या कटुंबातील मुलीला दिली जाते. अशावेळी त्या मुलीला त्या जमिनीबाबत सर्व अधिकार प्राप्त होतात. मात्र अशी जमीन त्या मुलीच्या मृत्यूनंतर कोणाकडे जाते? त्या जमिनीवर कोणाला अधिकार प्राप्त होतात? याबाबत कायदेशीर नियम (Ancestral Land) काय आहेत? याची सविस्तरपणे माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
समजा संबंधित महिला ही हिंदू धर्माची असेल तर प्रामुख्याने जमिनीच्या अधिकाराबाबत (Ancestral Land) दोन कायद्यांचा विचार करावा लागतो. एक म्हणजे इंडियन सक्षेशन ऍक्ट 1925 आणि दुसरा म्हणजे हिंदू सक्षेशन ऍक्ट 1956 होय. एखाद्या महिलेला तिच्या वडिलांकडून माहेरहून वडिलोपार्जित जमीन मिळाली असेल. तर अशा परिस्थितीत ती महिला जिवंत असेपर्यंत त्या जमिनीवर सर्वस्वी तिचा अधिकार असतो. संबंधित महिला जिवंत असेलपर्यंत अशा जमिनीवर तिचा पती, मुले, मुली किंवा अन्य कोणीही हक्क सांगू शकत नाही. (वडिलोपार्जित जमीन म्हणजे तीन पिढ्यांपासून चालत आलेली जमीन)
आईची जमीन कोणाला मिळते? (Mothers Ancestral Land Who Has Right’s)
संबंधित महिलेने आपल्या मृत्यूपूर्वी आपल्याला मिळालेल्या वडिलोपार्जित जमिनीबाबत (Ancestral Land) मृत्युपत्र केलेले असेल. तर इंडियन सक्षेशन ऍक्ट 1925 नुसार त्या महिलेने मृत्युपत्रात ज्या व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा उल्लेख केला असेल. अशाच व्यक्तींना ती जमीन दिली जाते. अर्थात आपल्याला मिळालेली वडिलोपार्जित जमीन ही कोणाला द्यायची हा सर्वस्वी अधिकार त्या महिलेचा असतो. महिलांना मिळालेल्या वडिलोपार्जित, स्व-कष्टार्जित, पतीकडून वारसा हक्काने मिळालेल्या सर्व संपत्तीला हा नियम लागू होतो. अर्थात महिला आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये एखाद्याला डावलू शकते. अशी वडिलोपार्जित जमीन विक्री देखील करू शकते. याउलट वडिलोपार्जित जमिनीमध्ये वडिलांना असा अधिकार नसतो.
हेही वाचा : वडिलोपार्जित जमीन वडिलांना विकता येते का? वाचा पुन्हा कशी मिळवाल! (https://hellokrushi.com/ancestral-land-can-sold-to-father-see-law/)
मृत्यूपत्र केले नसेल तर
जर एखाद्या महिलेने आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे मृत्यूपत्र केले नसेल. तर अशा परिस्थितीत हिंदू सक्षेशन ऍक्ट 1956 लागू होतो. यात त्या महिलेची संपत्ती ही प्रथम वारसांना (मुले, मुली) यांना विभागून दिली जाते. प्रथम वारसांमध्ये महिलेच्या पतीचा देखील समावेश असतो. प्रथम वारस जिवंत नसेल, काही कारणास्तव मृत्यू झाला असेल. तर अशी वडिलोपार्जित जमिन ही द्वितीय वारसांना अर्थात मुलाच्या/मुलीच्या मुलांना अर्थात नातवांना वाटली जाते. त्यांनतर तृतीय वारस असेल त्यांना देखील अशी जमीन दिली जाऊ शकते.
हेही वाचा : वडिलोपार्जित जमिनीतून बेदखल करता येते का? ‘हा’ अधिकार वडिलांना आहे का? वाचा… (https://hellokrushi.com/ancestral-land-fathers-right-can-one-be-evicted/)
मुले किंवा वारस नसेल तर
महिलांना आपल्या वडिलांकडून वडिलोपार्जित जमीन मिळालेली असेल. मात्र त्या महिलेला मुले किंवा संततीच नसेल तर अशा परिस्थितीत संबंधित महिलेची वडिलोपार्जित जमीन ही तिच्या मृत्यूनंतर पतीला मिळत नाही. तर अशी जमीन ही महिलेच्या माहेरी असणाऱ्या वारसांना दिली जाते. अर्थात अशा महिलेच्या भावाला, बहिणींना किंवा आईला ती जमीन मिळते.
शेती संदर्भात अशीच नवनवीन कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असे सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची शेतीविषयक माहिती, दररोजचे बाजारभाव आपल्या मोबाईलवर पाहू शकता.