हेलो कृषी ऑनलाईन : आपल्या देशात खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. खाद्यतेलाच्या (NMEO-Oilseeds) आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच तेलबिया उत्पादनाला चालना देण्यासाठी व खाद्यतेलांमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी राष्ट्रीय तेलबिया व खाद्यतेल अभियानाला काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे.
तेलबिया उत्पादनात (NMEO-Oilseeds) वाढ करण्याचे उद्दिष्ट
येत्या सात वर्षात तेलबियांच्या क्षेत्रात (NMEO-Oilseeds) स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशानं हे अभियान चालवलं जाणार आहे. सन 2024-25 ते सन 2030-31 या सात वर्षांसाठी 10 हजार 103 कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजुर करण्यात आला आहे. काल (दि. 3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
देशात सन 2022-23 मध्ये झालेल्या 39 दशलक्ष टन तेलबिया उत्पादनात वाढ करून ते सन 2030-31 पर्यंत 69.7 दशलक्ष टनापर्यंत नेणे, तेलबिया लागवडीखालील क्षेत्रामध्ये अतिरिक्त 40 लाख हेक्टरने वाढ करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.