हॅलो कृषी ऑनलाईन : सोलापूर वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे चारशे एकर माळरानावर विविध प्रकारच्या गवताची लागवड केली जाणार आहे. त्यासाठी 12 लाख रोपे तयार करण्यात आली असून ती लागवड तयार करण्यात येणार आहे. प्रामुख्याने चाऱ्याच्या उपलब्धते बरोबर जमिनीची धूप रोखणे आणि भूजल पातळी वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.सोलापूर जिल्हा माळरानासाठी प्रसिद्ध आहे. ही ओळख अधिक दृढ व्हावी माळरानाची परिस्थिती विकसित व्हावी यासाठी पालकमंत्री आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील माळशिरस पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर माळरान आहेत वनविभागातील वनविभागाच्या मुरमाड, रेताड, डोंगरमाथा गायरानावर हे गवत लावले जाणार आहे. या गवताच्या शेतीमुळे परिसरातील पक्षी वैभव वाढीस लागणार आहे. परिसरातील शेतकऱ्यांना चारा उपलब्ध होणार आहे. तसेच दरवर्षी या भागातून चाऱ्यासाठी स्थलांतर करणाऱ्या मेंढपाळांच्या स्थलांतर थांबवण्याचे उद्देश आहे. महत्त्वाचं म्हणजे या गवतामुळे जमिनीची धूप थांबवणे त्याचबरोबर भूजल पातळीत वाढ करण्याचा उद्देश देखील सफल होणार आहे असे पाटील म्हणाले.
दीनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि काळी धामण या विशिष्ट वाणांचे गवत लावण्यात येणार आहेत. त्यासाठी वनविभागाच्या चार रोपवाटिकांमधून सुमारे बारा लाख रुपये सध्या तयार करण्यात आली आहे. या वाणाच्या गवताची एकदा लागवड केल्यास पुढे तीन वर्षापर्यंत गवत उपलब्ध होऊ शकते. जिल्हा नियोजन समितीच्या गवत लागवड योजनेतून ही गवत रोपे लावली जाणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी रुपये आणि केंद्र शासनाच्या कॅम्प योजनेतून 50 लाख रुपये असा साधारण अडीच कोटी रुपयांच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.