हॅलो कृषी ऑनलाईन : पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा विद्युत तारांचा स्पर्श होऊन जीवित हानी झाल्याच्या घटना समोर येतात. अशीच एक घटना औरंगाबाद येथील वैजापूर तालुक्यातील बायगाव शिवारात घडली आहे. शेतातून घरी परतत असताना बैलाच्या शिंगात विद्युत तार अडकल्याने बैलांसह दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
बैलाच्या शिंगात अडकली विद्युत तार
साहेबराव गणपत चेळेकर (वय 70), लहान बंधू बाबुराव गणपत चेळेकर (वय 57) असे मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, दोन्ही चेळेकर बंधू हे एकत्रच राहतात. पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतात शेतीची कामे सुरु होती म्हणून हे दोघे बंधू शेतात गेले होते. शेतातून काम आटोपून साहेबराव हे बैलगाडी घेऊन घरी निघाले होते. याच दरम्यान शेजारील एका शेतकऱ्याने विनाखांब नेलेली विजेची तार उंची कमी असल्याने साहेबराव यांच्या बैलाच्या शिंगात अडकली. यामुळे वीजप्रवाह बैलगाडीत उतरला आणि बैलासह साहेबराव यांचा जागीच मृत्यू झाला.
छोट्या भावाला वाचवण्यासाठी गेला अन…
दरम्यान साहेबराव यांना विजेचा मोठा धक्का बसल्यामुळे याठिकाणी मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकताच बाबुराव आपल्या भावाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना देखील विजेचा शॉक लागून त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला. त्यांनतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी वीजप्रवाह बंद करून दोन्ही भावांना उपचारासाठी देवगाव रंगारी येथील रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.
एकाचवेळी ऐकाच घरातील दोन महत्वाच्या व्यक्तींवर काळाने झडप घातल्याने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर घटनास्थळी शिऊर पोलिसांनी पाहणी करत तपास सुरु केला आहे.