हेलो कृषी ऑनलाईन : सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाकडून महाराष्ट्रात सन 2015 पासून सौर कृषी पंपाच्या (Solar Agriculture Pump Scheme) विविध योजना राबविण्यात येते. यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्यात आली होती. तसेच सद्यस्थितीत प्रधानमंत्री कुसुम घटक- ब योजनेंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यात येत आहे. राज्यात दि. 9 सप्टेबर 2024 पर्यंत 2 लाख 63 हजार 156 सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना या सौर ऊर्जेचा मिळालेला लाभ तसेच सौर कृषी पंपाबाबत शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेवून राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना (Solar Agriculture Pump Scheme) जाहीर केली आहे.
या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य
राज्य सरकारच्या सन 2024 च्या अर्थसंकल्पात `मागेल त्याला सौर कृषी पंप´ (Solar Agriculture Pump Scheme) या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील जवळपास 8 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. याआधी पीएम कुसूम अंतर्गत ही योजना राबविली जात होती. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सौरपंपाची मागणी होती. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरिता पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत राज्यात सौर कृषी पंप (Solar Agriculture Pump Scheme) आस्थापित करण्यात येणार आहेत. महावितरणकडे पैसे भरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेंतर्गत नवीन सौर कृषी पंप (Solar Agriculture Pump Scheme) मिळण्याकरिता महावितरणतर्फे स्वतंत्र वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. वेबपोर्टवरून किंवा https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/index_mr.php लिंकवर जाऊन, अर्जदारास A-1 अर्ज ऑनलाईन भरायचा आहे. सदर अर्ज अगदी साधा व सोपा असून, अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- आधारकार्ड
- जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/ जमाती लाभार्थ्यांसाठी)
- अर्जदार स्वतः शेतजमिनीचा एकटा मालक नसेल तर इतर हिस्सेदारांचा/मालकांचा ना हरकत दाखला देणे बंधनकारक
- पाण्याचा स्त्रोत डार्क झोनमध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागामार्फत ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक
- संपर्कासाठी मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता (असल्यास)
- पाण्याची खोली व त्याची माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक
योजनेची उद्दिष्ट्ये
• सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून मिळणार सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
• अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
• उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
• जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
• पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
• वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
• सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा
लाभार्थी निवडीचे निकष
• 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, 2.51 ते 5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा आणि 5 एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
• वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
• ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
• अटल सौर कृषी पंप योजना-1, अटल सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.