हॅलो कृषी ऑनलाईन : खासदार संजयकाका पाटील यांच्या तासगाव व नागेवाडी या दोन्ही कारखान्याची बिले अद्याप दिलेली नाही. त्यामुळेच मंगळवारी दिनांक २० जुलै रोजी भीक मागो आंदोलन व त्यांच्या तासगाव येथील संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. व ठिय्या मारलेले शेतकरी तासगाव घरोघरी जावून भाकरी मागतील. अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे म्हणाले, तासगाव व नागेवाडी या दोन कारखान्याची ऊस बिले अद्याप दिलेली नाहीत.१५ जानेवारी पर्यंतची ऊस बिले दिलेली आहेत. मात्र त्यानंतर गाळप झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत ऊस गाळप होवून सहा महिने उलटून गेले आहेत. कायद्याने गाळपानंतर १४ दिवसात ऊस बिल देणे बंधनकारक असताना ही सहा महिने विलंब झाला आहे. या प्रश्नावर आम्ही स्वाभिमानीच्या वतीने तीन आंदोलने करण्यात आली. प्रत्येक वेळी तारखा आणि आश्वासने देण्यात आली पण ती पाळली नाहीत. २१ जून रोजी मोर्चा काढणार येण्यात होता. मात्र २० जून रोजी व्यवस्थापक आर डी पाटील हे चर्चेसाठी आले सांगलीत सर्व पदाधिकारी बरोबर त्यांची चर्चा झाली त्यावेळी त्यांनी चेक दाखविले आणि २१ जून पासून बिल देण्यास प्रारंभ करत आहोत. त्यामुळे आंदोलन स्थगित करा अशी विनंती केली.
सर्वांशी चर्चा करून आंदोलन स्थगित केले. मात्र त्या चर्चेला २० जुलैला एक महिना होत आहे. मात्र बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळेच २० जुलै पासून तासगाव मार्केट यार्डातील संजयकाका पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनास बसलेले शेतकरी तासगावात घरोघरी जावून भाकरी मागून गुजराण करतील. भीक मागतील मात्र बिल मिळाल्याशिवाय हटणार नाहीत. असा निर्धार करण्यात आला आहे.