‘पोकरा’ अंतर्गत 327 गावांकरिता 130 कोटींचा आराखडा मंजूर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 327 गावाच्या 13०. 88 कोटींच्या मृदा व जलसंधारण प्राथमिक अंदाजपत्रक आराखडा यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिनांक 17 रोजी मंजुरी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेसंदर्भात जिल्हा सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

‘या’ गावांचा समावेश
जिल्ह्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील 327 गावांमध्ये औरंगाबाद तालुक्‍यातील 45, पैठण 53, फुलंब्री 24, वैजापूर 54, गंगापूर 35, खुलताबाद 11, सिल्लोड३०, सोयगाव 22 आणि कन्नड तालुक्यातील 53 गावांचा समावेश आहे. कृषी विभाग आणि ग्राम संजीवनी समितीच्या समन्वयक आणि मृदसंधारण कामांबाबत आराखडे तयार करण्यात आले आहेत.

या कामांचा समावेश
— जल व मृदा संधारण कामांमध्ये सिमेंट नाला बांध
–कंपोझिट गॅबियन
–कंपार्टमेंट बंडिंग
–नाला खोलीकरण
–अनघड दगडी बांध
–समतल चर
–माती नालाबांध

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी पी आर देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड आदींसह कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.