हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचावे हा प्रयत्न राज्याच्या कृषी विभागाचा आहे. त्याकरिता राज्याच्या कृषी विभागाकडून कृषी संजिवणी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत शेती संबंधित दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी कृषी शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही मोहीम एक जुलैपर्यंत सुरू राहणार असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषि विभगामार्फत 1 जुलैपर्यंत राज्यभर कृषी संजीवनी मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमे अंतर्गत दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
— Dadaji Bhuse (@dadajibhuse) June 23, 2021
एक जुलैपूर्वीच मोहिमेला सुरुवात
तसे पाहायला गेले तर कृषी संजीवनी मोहीम ही एक जुलै पासून राबवली जाते. परंतु त्या काळापर्यंत खरीप पिकांची पेरणी आणि जमीन मशागतीचा महत्त्वाचा टप्पा सुरू झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन एक जुलैपूर्वी ही मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. या मोहिमेअंतर्गत 21 जून पासून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमीन आरोग्य कार्ड नुसार खतांचा संतुलित वापर यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
‘या’ विषयावर मार्गदर्शन
या मोहिमेअंतर्गत 24 जून रोजी एक गावे कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवडीविषयी तंत्रज्ञान, कडधान्ये व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आज 25 जून रोजी विकेल ते पिकेल, 29 जूनला रिसॉर्ट बँकेतील शेतकऱ्यांचा पीक उत्पादनवाढीसाठी सहभाग, 30 जून ला प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकाची किड व रोग नियंत्रण व उपाय योजना या बाबतीत या मोहिमेअंतर्गत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
एक जुलैला समारोप
एक जुलैला म्हणजेच कृषी दिनी या योजनेचा समारोप होणार आहे. या मोहिमेमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा यांनी दररोज किमान एका गावात तर उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावातील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन मार्गदर्शन करावे या बाबतच्या सूचना कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहेत.