शेतकऱ्यांनो रासायनिक खतांना लांबच ठेवा ‘जीवामृत’ आहे हुकमी एक्का..! जाणून घ्या बनवण्याची कृती आणि फायदे

jivamrut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या अनेक शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय शेती करण्याकडे आहे. अशात जीवामृत हे पिकांसाठी वरदान ठरते. जीवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. त्याचा जास्तीत जास्त वापर करणे फायद्याचे ठरते. जेणेकरून रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होऊन पर्यायाने, उत्पादन खर्चात घट होऊन उत्पन्न वाढते.

जीवामृताचे फायदे

— पिकाची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात चांगल्या प्रकारची वाढ दिसून येते.
–जीवामृत वापरल्याने पिकांची सहनशीलता वाढते.
–किड आणि रोगांना पिकापासून दूर ठेवण्याची प्रतिकारशक्ती उत्पन्न होते.
–जीवामृत वापरल्याने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.
–शेतामध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे पिकांचा किडींपासून बचाव होतो.
–जर आपण ठिबक सिंचन पद्धती वापरत असाल तर त्याद्वारेही, पिकांना ड्रीपद्वारे जीवामृत सोडता येते.

जीवामृत कसे तयार करायचे जाणून घ्या

साहित्य
१) १० लिटर गोमूत्र किंवा पाच ते सात लिटर देशी गाईचे गोमुत्र घेतले तरी चालते.
२) ५ किलोग्रॅम गूळ,३) गाईचे ५ किलोग्रॅम शेण,
४) २ किलोग्रॅम बेसन पीठ,
५) २ किलो ग्राम वारूळची माती किंवा वडा खालची माती घ्यावी.
आणि २०० लिटर पाण्याची टाकी एवढे साहित्य जीवामृत बनविण्यासाठी आवश्यक असते.

जीवामृत बनवण्याची पद्धत

–सुरुवातीला एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये किंवा डब्यामध्ये पाच किलो गाईचे शेण घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालावे.
–ते अशा पद्धतीने मिसळावे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ राहणार नाही.
–दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा.
–या मिश्रणामध्ये गूळ टाकण्याचा फायदा असा होतो की, तयार झालेल्या मिश्रणामध्ये जे उपयुक्त बॅक्टेरिया असतात ते पटकन अॅक्टिव्ह होतात.
–गूळ मिसळताना, त्याचे खडे राहणार नाहीत, ते पाण्यामध्ये पूर्णपणे एकजीव होतील अशा पद्धतीने मिसळावेत.
–नंतर त्या गुळाच्या मिश्रणाला, तयार केलेल्या शेणयुक्त व गोमूत्रयुक्त मिश्रणामध्ये टाकून चांगल्या प्रकारे ते मिसळावे. नंतर या मिश्रणाला ढवळून घ्यावे.
–या मिश्रणामध्ये दोन किलोग्रॅम बेसन पीठ टाकून चांगल्या पद्धतीने मिक्स करावे. थोड्या वेळापर्यंत हे मिश्रण चांगल्या प्रकारे हलवत राहावे.
–नंतर सगळे मिश्रण 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्या बॅरलमध्ये पूर्ण पाणी भरावे.
–नंतर शेतातील बांधावरची मूठभर माती बॅरलमध्ये टाकून सगळे मिश्रण एकत्र करावे.
–हे तयार केलेले द्रावण सावलीत ठेवावे. हे द्रावण कमीत कमी दोन ते तीन दिवस सावलीत ठेवून सकाळ-संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे.
–सात दिवसांत जीवामृत वापरले तरी चालते.
–एक एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर जीवामृत हे पुरेसे ठरते.