Bird Flu : केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला, केंद्राचे सर्व राज्यांना खबरदारीचे आदेश!

Bird Flu In Kerala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर येथील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रातील मृत कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू (Bird Flu) आजाराला कारणीभूत असणारा एच ५ एन १ हा विषाणू आढळला होता. तेव्हापासून आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये पक्षी आणि कोंबड्यांमध्ये एव्हियन इन्फ्लूएन्झा (बर्ड फ्लू) विषाणूचा (Bird Flu) प्रादुर्भाव झाल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी (३१ मे) सर्व राज्य सरकारांना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहेत केंद्राचे आदेश (Bird Flu In Kerala)

देशात अनेक ठिकाणी एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणूने बाधित झालेले रुग्ण आढळल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी (३१ मे) सर्व राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एव्हियन इन्फ्लूएन्झाला बर्ड फ्लू म्हटले जाते. “कुठेही पक्षी आणि कोंबड्यांचा असामान्य मृत्यू झाल्यास त्या प्रकरणी लक्ष घाला, सावध राहा आणि यासंबंधीची माहिती ताबडतोब पशुसंवर्धन विभागाला कळवा”, असे केंद्र सरकारने राज्य सरकारांना पाठवलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रतिबंधात्मक वस्तूंचा साठा तयार ठेवा

केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच त्यांना सांगितले आहे की, तुमच्या राज्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, खासगी रुग्णालयांना एव्हियन इन्फ्लूएन्झाची चिन्हे आणि लक्षणांची माहिती द्या. त्याचबरोबर सर्व पोल्ट्री फार्मची तपासणी करा. स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिलेले सर्व नियम तिथे पाळले जात आहेत की नाही याची तपासणी करा. लोकांना एव्हियन इन्फ्लूएन्झापासून बचाव कसा करावा याबद्दल माहिती द्या. त्यावरील औषधे, पीपीई किट, मास्क आणि इतर प्रतिबंधात्मक वस्तूंचा साठा तयार ठेवा. असेही केंद्र सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.

100 पट अधिक धोकादायक

दरम्यान, एप्रिल २०२४ मध्ये यूके-आधारित डेली मेलने अहवाल दिला होता की बर्ड फ्लू “कोविड १९ च्या साथीच्या आजारापेक्षा १०० पट वाईट परिस्थिती निर्माण करू शकतो आणि मृत्यू दर वाढवू शकतो.” त्यामुळे आता तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे की, हा बर्ड फ्लूचा व्हेरिएंट प्रचंड वेगाने पसरत आहे आणि त्यात जागतिक महामारी निर्माण करण्याची क्षमता आहे. केंद्र सरकारने राज्यांना एव्हियन इन्फ्लूएन्झाचा प्रसार रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांनाही सतर्क राहणे आणि एव्हियन इन्फ्लूएन्झाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.