विनापरवाना कारखाना सुरु, ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांचे गव्हाणीतच ठिय्या आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी ची रक्कम अद्याप अदा केली नाही अशा साखर कारखान्यांना गाळप सुरू करायची परवानगी साखर आयुक्तांकडून नाकारली गेली आहे. कारखाना सुरु केल्याचे कळताच सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरु केले. त्यामुळे कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील उपळाई येथे भजपाचे हर्षवर्धन पाटील यांचा इंद्रेश्वर साखर कारखाना आहे. मात्र, या कारखान्याकडून गतवर्षीची एफआरपी ची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. असे असतानाही साखर कारखान्यात ऊसाचे गाळप हे सुरुच होते. शिवाय आता इतर भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासने देऊन गाळप वाढविण्यात येत होते. हीच बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शास आली. त्यामुळे बेकायदेशीर गाळप बंद करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीतच ठिय्या मांडला. त्यामुळे काही वेळातच गाळप हे बंद करण्यात आले होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, रविवारी त्यांनी बेकायदेशीर साखर कारखाने सुरु असतील तर कारखान्याचे गाळप बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार इंद्रश्वेर साखर कारखान्याचे गाळप बंद करण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ परबत यांच्यासह कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या गव्हाणी मध्ये बसून त्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे.