हॅलो कृषी ऑनलाईन : संपूर्ण राज्यात मागील दोन दिवसांपासून मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापुरातील कुसलंब गावात बोरांच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, कुसलंब हे गाव बोरीच्या बागासाठी प्रसिद्ध आहे. येथील बोरे सर्व महाराष्ट्रात नव्हे तर राज्याबाहेर ही विक्री साठी पाठविली जातात. परंतु, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणत बागांचे नुकसान झालेले आहे. काही झाडाच्या फांद्या मोडल्या आहेत तर काही झाडांच्या सर्वच फांद्या मोडल्याने झाड निकामी झाले आहे. शेतकऱ्याने छाटणी, फवारणी कष्ट करून फुलवलेल्या झाडांच्या फांद्या मोडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. आता नुकसान झालेल्या बागेचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बाबासाहेब दत्तात्रय काशीद यांनी आपल्या शेतात यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेने झाडांची चांगली देखभाल केली होती. झाडांची छाटणी केल्यापासून आतापर्यंत त्यांनी या झाडांकरिता ४० हजार रुपये खर्च केले होते. मात्र सोमवारी आलेल्या वादळी पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली आहेत तर जवळपास सर्व झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. त्यामुळे सरकारने तावरीत पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी काशीद यांनी केली आहे.